ग्राप ने उत्पन्न व वसुली सादर केल्याशिवाय कर्मचाऱ्याचे वेतन देऊ नये या अटीमुळे विलंब
सिंधुनगरी | प्रतिनिधी
वेतन व वेतन फरकातील रक्कम जमा न झाल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भवना समोर शक्ती प्रदर्शन केले. ग्रामपंचायत कर्मचारी वेतनासाठी एप्रिलमध्ये ४ कोटी ६७लाख रुपयाचा निधी शासनाकडून आला मात्र तो वेळेत वितरीत झाला नाही असा आरोप या कर्मचारी युनियनचे कोकण विभागीय अध्यक्ष तथा जिल्हा सचिव अभय सावंत यांनी या आंदोलना दरम्यान केला.
याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती दिली. एप्रिलमध्ये प्रत्यक्षात निधी आला तरी जोपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायत आपले उत्पन्न व आपली वसुली याबाबतची माहिती जिल्हा परिषदेकडे पाठवीत नाही तोपर्यंत या कर्मचाऱ्यांचे वेतन व फरक देऊ नये अशी अट घातली होती. त्यामुळे जिल्ह्यातील ४३२ ग्रामपंचायतीकडून ही पूर्तता होईपर्यंत विलंब झाला. या संदर्भात काल सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत विस्तृत माहिती दिली होती. व या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. बँकिंग व्यवहारातून हे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन-तीन दिवसात जातील असेही त्यांनी स्पष्ट केले होते. प्रत्येक ग्रामपंचायतच कार्यक्षेत्रातील लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक ग्रामपंचायतला कर्मचारी आकृतीबंध मंजूर आहे. ग्रामपंचायतचे उत्पन्न व त्याची वसुली याबाबतची माहिती गुगल फॉर्म भरून घेऊन त्याबाबत पुरावे सादर करण्याचे बंधन शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींना घालण्यात आले होते. व ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने या कर्मचाऱ्यांचे वेतन देयक देण्याची प्रक्रिया हाती घेतली. यापूर्वी या कर्मचाऱ्यांना ठेकेदार कंपनीमार्फत वेतन दिले जात होते. मात्र शासनाने ही ठेकेदारी रद्द करून जिल्हा परिषद प्रशासनाकडून वेतन देण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे. अशी विस्तृत माहिती पुन्हा जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी यापूर्वी निवेदन दिल्याप्रमाणे मंगळवारी जिल्हा परिषद भवन समोर ठिया आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी यांचे अध्यक्ष अविनाश परब, जिल्हा सरचिटणीस अभय सावंत, यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी मनोज सावंत, हनुमंत चव्हाण, वसंत परब, संदीप जाधव, समीर सावंत, बापू घाडी या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.


