निवती येथील संगमावर पलटी झालेल्या बोटमधील दोन खलाशांचा पाण्यात बुडून झाला मृत्यू

0

बोटीवर होते १४ खालाशी त्यापैकी १२ जण सुखरूप बचावले

सरपंच अवधूत रेगे यांच्यासह ग्रामस्थांनी मदत कार्यासाठी घेतली धाव

(बुडालेली हीच ती बोट)

वेंगुर्ले | प्रतिनिधी 

निवती येथे समुद्रकिनाऱ्याच्या २०० मीटरच्या अंतरावर मच्छीमाऱ्यांची बोट पलटी होऊन यामध्ये दोन खलाशांचा मृत्यू झाला आहे ही घटना मध्यरात्री घडली असून याबाबत पुढे नियुक्ती पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे या बोटीवर १४ खलाशी होते त्यापैकी १२ खलाशी सुखरूप बाहेर पडले. हे सर्व खलाशी स्थानिक असल्याची माहिती मिळत आहे. 

निवती समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी काल शुक्रवारी रात्री आनंद धुरी यांची मच्छीमारी बोट १४ जण घेऊन गेले होते. मच्छीमारी झाल्यानंतर आज मध्यरात्री ते निवती किनारपट्टीवर येत होते किनारपट्टीच्या २०० मीटरच्या अंतरावर ही बोट आली निवती समुद्र व खाडी यांचा ज्या ठिकाणी संगम होतो. त्या ठिकाणी आल्यावर ही बोट पलटली. बोट पलटल्यावर सर्व खलाशी पाण्यात पडले दरम्यान यातील निवती श्रीरामवाडी येथील आनंद पुंडलिक पराडकर (सुमारे वय ५८) व खवणे येथील रघुनाथ उर्फ भाऊ ऐरागी (सुमारे वय ४८) हे दोघेजण पाण्यात बुडाले. बोट बुडाल्यावर हे दोघेजण मासेमारी करण्यात येणाऱ्या जाळ्यांमध्ये अडकल्यामुळे त्यांना बाहेर येता येईना त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे. किनाऱ्यावरील येत असताना बोटीचे इंजिन बंद पडले आणि समुद्राच्या लाटेत ही बोट बुडाली असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या घटनेतील बचावलेल्या खलाशी यांनी अद्याप आपला जबाब पोलिसांकडे दिला नसल्यामुळे नेमकी घटना कशी घडली हे समजू शकले नाही. ही घटना समजतात निवती सरपंच अवधूत रेगे, यांच्यासह उपसरपंच गोविंद जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्रज्योत मेतर, माजी ग्रामपंचायत सदस्य नागेश सारंग अन्य निवती ग्रामस्थांनी घटनास्थळी धावून मदतकार्य सुरू केले घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली.