वन विभागाच्या रेस्कु टीमकडून बिबट्याची सुखरूप सुटका
कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे कदमवाडी-नळ्याचा पाचा येथे सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. तसेच बिबट्यावर आवश्यक ते उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, कदमवाडी-नळ्याचा पाचा येथे सार्वजनिक विहीर आहे. आज सकाळी ६.३० च्या दरम्यान येथील नाग्या म्हादू वसतिगृहाचे प्रमुख उदय आईर हे विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीत ओरडण्याचा आवाज येत असल्याचे त्यांना ऐकू आले. त्यावेळी त्यांना विहिरीत बिबट्या पडला असल्याचे आढळून आले. याबाबत स्थानिक नागरिक उदय आईर यांनी तत्काळ वनविभाग कुडाळ कार्यालय आणि स्थानिक नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी विहिरीच्या ठिकाणी जमू लागले. त्यानंतर ८ वाजण्याच्या सुमारास कुडाळ वनअधिकारी आणि रेस्कु टीम घटनास्थळी दाखल झाली. या टीमने विहिरीमध्ये पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले. तसेच सदर बिबट्याला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
हे रेस्कू ऑपरेशन उप वनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या रेस्कु ऑपरेशनमध्ये
सहा. वनसंरक्षक एस. के. लाड
कुडाळचे वनक्षेत्रपाल चेतन पाटील,
वनपाल सूर्यकांत सावंत, वनपाल प्रकाश पाटील, वनरक्षक समीर खरवत, प्रसाद पाटील, अनिकेत माने,
स्वप्नील सव्हाशे, जलद बचावपथक (आरआरटी कुडाळ) दिवाकर बांबर्डेकर, प्रसाद गावडे, अनिल गावडे, वैभव अमृस्कर, सुशांत करंगुटकर, धनंजय मेस्त्री, चालक राहुल मयेकर हे सामील होते.
याबाबत कुडाळचे वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या या भागात आला असता तो विहिरीत पडला असावा. सदर बिबट्या साधारण अडीच वर्षांचा आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिक उदय आईर, मोहन कदम, संतोष पानवलकर, आकाश पावसकर, चंद्रकांत मेजारी, दुर्गादास झोरे यांच्या विहिरीतील पंपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वनविभाग तत्पर:
जिल्ह्यात अनेक भागात वन्यप्राणी मानवी वस्तीत येण्याच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांबाबत जिल्ह्याचा वनविभाग सतर्क असून रेस्कु टीम अशा घटना घडल्यानंतर त्या भागात पोहचून वन्यप्राण्यांना रेस्कु करीत असतात.


