धाराशिव येथील शैक्षणिक सहल घेऊन आलेल्या एसटीला देवगडमध्ये भीषण अपघात

0

देवगड | प्रतिनिधी

खाकशी मार्गे कुणकेश्वर कडे जाणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या बसला खाकशी शाळेजवळील धोकादायक वळणावर चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटून गाडी डाव्या बाजूला पाच फूट खाली जाऊन नळयोजनेच्या पाईपलाईनला धडकून झालेल्या भीषण अपघातात चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. या अपघातात एसटीचे मोठे नुकसान झाले आहे . एसटी नळयोजनेच्या पाईप लाईनला धडकल्याने पाईपलाईन फुटून पाणी रस्त्यावर आले त्यामुळे देवगड जामसंडे शहराच्या पाणीपुरवठा बंद झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती समजताच देवगड आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुख व कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील जयहिंद विद्यालय कसबे तडोळे या शाळेची सहल शुक्रवारी धाराशिव आगाराच्या एसटी बसने देवगडमध्ये आली होती . दुपारी मिठमुंबरी येथे जेवण करून ही सहल खाकशी मार्गे कुणकेश्वर कडे जाण्यासाठी रवाना झाली. मात्र खाकशी शाळेनजीक असलेल्या धोकादायक वळणावर चालक विभीषण गायकवाड यांचा एसटी बसवरील ताबा सुटल्याने गाडी डाव्या बाजूला पाच फूट खाली गेली. सुदैवाने झाडेझुडपे आंबा बागायत व देवगड नळयोजनेची पाईपलाईन असल्याने त्या पाईपलाईनला जाऊन एसटी धडकली. मात्र एसटीच्या धडकेने पाईपलाईन फुटून पाणी रस्त्यावर आले. अपघाताची भीषणता एवढी होती की पाईपलाईनचे दोन तुकडे झाले व नळयोजनेच्या जॉईंटला तडे गेले आहेत. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने मोठी जीवितहानी झालेली नाही. बस मध्ये ४४ विद्यार्थी व ४ शिक्षक असे एकूण ४८ जण होते.मात्र बसमधील चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.अपघाताची माहिती समजतात स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाव करून सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना अपघातग्रस्त एसटीतून बाहेर काढले.एसटी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप, स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर, तसेच एसटी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थी शिक्षक चालक यांना बसमधून खाली उतरून त्यांची तात्काळ खाकशी येथील साई मंदिरात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. देवगड आगार व्यवस्थापक यांनी तात्काळ देवगड आगाराच्या बसची व चालकाची व्यवस्था करून शालेय सहलीतील सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना सहलीच्या पुढील प्रवासासाठी रवाना केले.

सध्या पर्यटन हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणात शालेय सहली कोकण पर्यटनासाठी देवगड मालवण या ठिकाणी येत आहेत .मात्र खाकशी येथील धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातामुळे सहलीतील मुलांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच धोकादायक वळणावर संरक्षक गार्ड बसविणे. आवश्यक आहे कारण यापूर्वीही एसटी व इतर वाहनांचा अपघात या ठिकाणी झालेला आहे. बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी या निमित्ताने होत आहे. अपघातातील चालकाने ब्रेक लागलेलाच नाही अशी माहिती आगार व्यवस्थापकांना दिली. तरी आगार व्यवस्थापक घोलप यांनी याची सविस्तर चौकशी करणार असल्याचे यावेळी सांगितले.