कुडाळ | प्रतिनिधी
मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील डिलाईल रोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळ बांबर्डे (ता. कुडाळ) येथील ‘नाम्या महादू वस्तीगृह’ येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, पोषण आहार, दर्जेदार कपडे व आवश्यक औषधांचे वाटप करण्यात आले.
वानरमारे व कातकरी समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी छोटासा हातभार लावण्याच्या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. डॉ. सुमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमातून मंडळाची सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची भावना अधोरेखित झाली.
यावेळी संस्थेचे प्रमुख उदय सर यांनी पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाचे कौतुक करून मुलांच्या चेहर्यांवरील हास्य हीच मंडळासाठीची पोच पावती आहे असे बोलून, “मुंबईतील एका नामवंत उत्सव मंडळाने आदिवासी भागातील वानरमारे व कातकरी समाजातील मुलांच्या शिक्षणाची गरज ओळखून पुढाकार घेतला, ही अत्यंत आनंदाची व प्रेरणादायी बाब आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मंडळाने दिलेली ही साथ निश्चितच मोलाची असून, त्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.” असे उद्गार काढ़ले.


