वैभववाडी, (वार्ताहर )-
महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका जांभवडे तिरवडे आणि नेर्ले या तीन गावांना बसला आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत पोल कोसळल्याने या तीन गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे गेले पाच दिवस नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. युद्धपातळीवर जरी विद्युत पोल बसवण्याचे काम सुरू असले तरी तेवढ्या गांभीर्याने या कामाकडे महावितरणच्या अधिकाऱ्यानी पाहिले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या गावांना रत्नागिरी जिल्ह्यातील मुर गावातुन तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा चालू करता आला असता. परंतु अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले आहे.
मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नेर्ले खिंड ते उपळे दरम्यान इलेक्ट्रिक पोल कोसळून पडले. यामुळे नेर्ले,तिरवडे,जांभवडे या गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. परिणामी या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागले आहे. गेले पाच दिवस मोबाईल चार्जिंग नसल्याने ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. याशिवाय पाणीपुरवठा आहे ठप्प झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश कारखान्यात गणेश मूर्ती बनवण्याचे काम सुरू असल्याने याचा फटका मूर्तिकारांना बसला आहे. रात्रंदिवस गणपती रंगवण्याचे काम सुरू असताना केले पाच दिवस लाईट नसल्याने मूर्तिकार हवालदील झाले आहेत.
सध्या पोल बसवण्याचे काम सुरू असले तरी असले तरी या कामात मोठे अडथळे येत आहेत. जंगल भाग, पाऊस, वारा यांचा अडथळा असतानाच हे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मॅनपावरची गरज होती. मात्र महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यातच कॉन्ट्रॅक्टरनेही म्हणावे तसे तसे सहकार्य केले नाही. त्यामुळे पोल उभारण्याच्या कामात उशीर होत आहे. या गावाना लागून असणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील मुर येथून तात्पुरता सप्लाय देऊन ग्रामस्थांची गैरसोय टाळता येऊ शकली असती. मात्र वितरण च्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. पालकमंत्री ना नितेश राणे यांनी याकडे लक्ष घालून काळोखाच्या साम्राज्यात सापडलेल्या ग्रामस्थांची गैरसोय टाळावी अशी मागणी जांभवडे गावाचे प्रतिष्टीत नागरिक सोनबा कोकरे यांनी केली आहे.


