राजू शेट्टीचा निर्वाणीचा इशारा..!
पालकमंत्री नितेशराणे अचानकपणे मोर्चेकरांसमोर दाखल…*शासनामार्फत दिले ठोस आश्वासन..!
ओरोस,12मार्च
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा – काजू बागायतदार आणि शेतकऱ्यांना येत्या दहा दिवसात 22 मार्च पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही आणि इतर प्रश्नांबाबत शासनाने तातडीने निर्णय घेतले नाहीत तर येत्या 23 मार्च रोजी मुंबई गोवा महामार्ग रोखून धरण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे दिला.
वेंगुर्ले येथे अलिकडेच झालेल्या आंबा – काजू बागायतदार आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत बोलताना शेट्टी यांनी आजच्या आक्रोश मोर्चाची घोषणा केली होती त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चासमोर बोलताना शेट्टी यांनी हा इशारा दिला.
आंब्याला हेक्टरी पाच लाख तर काजूला हेक्टरी तीन लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी आंदोलकांची प्रमुख मागणी असून त्याशिवाय इतर अनेक प्रश्नांवर शासनाने कायमस्वरूपी निर्णय घ्यावा असाही आंदोलकांची आग्रही मागणी आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली जवळ नांदगाव येथे हा रस्ता रोको करण्यात येणार आहे.बदलत्या हवामानाचा फटका यंदा कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना बसला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 85 ते 90 टक्के नुकसान झाले आहे सध्याचे हवामान असेच राहिले तर उरलेले दहा टक्के उत्पादनही हाती लागणार नाही असे मत कोकण कृषी विद्यापीठाच्या तज्ञांनी तसेच कृषी तज्ञांनी व्यक्त केले. आणि म्हणूनच जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदार झाले आहेत.
राजू शेट्टी यांचे भाषण सुरू असतानाच अवघ्या काही मिनिटातच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे अचानक पणे व्यासपीठावर आगमन झाले त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे हे होते. शेतकरी संघटनेच्या या सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाला पालकमंत्री राणे हे सामोरे जाणार याची याची माहिती काल रात्रीच पोलिसांना होती त्यानुसार आज कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.राणे थेट व्यासपीठावर दाखल झाले. शेट्टी यांनी आपले भाषण मध्येच थांबवले. राणे यांच्या विनंतीनुसार शेट्टी यांनी आंदोलकांच्या वतीने सर्व मागण्या पुन्हा एकदा त्यांच्यासमोर मांडल्या. त्यावर आपण या मागण्या पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणू आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधितांची बैठक बोलावून त्यावर अंतिम निर्णय घेऊ असे आश्वासन दिले सदर बैठकीला शेट्टी यांच्यासह आंदोलकांच्या काही प्रतिनिधीनाही आमंत्रित करू असे सांगून राणे निघून गेले.पालकमंत्री निघून जातात शेट्टी यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली मात्र यावेळी पालकमंत्र्यांच्या आश्वासनाला प्रतिसाद न देता उलट शेट्टी यांनी आक्रमक भाषण करत चक्काजामचा इशारा दिला.
आम्ही आमच्या मागण्या शासनाचे प्रतिनिधी या नात्याने राणे यांच्यासमोर ठेवले आहेत. आता त्यावर अंतिम निर्णय शासनाने घ्यायचा आहे आणि तोही 22 मार्चपर्यंत. अन्यथा 23 मार्चला शेतकरी बागायतदार रस्त्यावर उतरतील. पर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत हे ‘ चक्का -जाम’ आंदोलन सुरूच राहील असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला.उबाठा सेनेचे माजी आमदार वैभव नाईक, राजन तेली,आदींची यावेळी भाषणे झाली. कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, अमित सामंत, अबीद नाईक, आदी सर्वपक्षीय नेते आजच्या मोर्चात सहभागी झाले होते.


