वेंगुर्ले | प्रतिनिधी
यावर्षी बदलत्या हवामानामुळे आंबा काजूचे मोठे नुकसान झाले आहे. या धक्क्यामुळे बागायतदार शेतकरी कोलमडून पडला आहे. आम्ही शासनाकडे याबाबत वस्तुस्थिती मांडून नुकसानीची मागणी केली आहे. शासन याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहे. तसेच खासदार नारायण राणे यांनीही केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे हा विषय मांडून नुकसानीची मागणी केली आहे. दरम्यान आंबा बागायतदार यांच्या शिष्टमंडळाने आज पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतल्यावर उद्या १२ मार्च रोजी सिंधुदुर्गनगरी येथे होणाऱ्या मोर्चाविषयी माहिती दिली. त्यावर बोलताना सर्वांनी मोर्चा शांततेत पार पाडावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच सरकार आज आणि यापुढेही शेतकऱ्यांच्या बरोबरच आहे असे पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकरी बागायतदार यांच्या शिष्टमंडळाशी बोलताना स्पष्ट केले.
सन २०२५-२०२६ मध्ये आंबा व काजु चे भयानक नुकसान झालेले आहे. आबा व काजू उत्पादक शेतकरी नेस्तनाबूत झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जवळपास ९९/९५% नुकसान झालेले आहे. कोकणाची अर्थनीती हया दोनच उत्पन्नावर अवलंबून आहे. कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी खते व औषधे घेऊन खर्च केला आहे. कामगाराची मजूरी, वाहतूक, इतर खर्च, आहेतच मात्र यावर्षी यातील कुठलाही खर्च निघू शकत नाही. याला वाचा फोडण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधून नुकसान भरपाई ची मागणी शासनापर्यंत पोहोचावी म्हणून उद्या १२ मार्च रोजी जिल्हास्तरीय मोर्चा अंबा बागायतदार शेतकरी यांनी आयोजित केला आहे. या मोर्चाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे.
दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सुरुवाती पासून च सकारात्मक भूमिका घेतली. अधिकारी, शेतकरी यांच्याशी संर्पक केला. तसेच मुख्यमंत्री यांच्यासमोर वस्तूस्थीती निदर्शनास आणली. विधान सभेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. त्याचप्रमाणे अनेक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी हा विषय सरकार दरबारी मांडला आहे. त्याच धर्तीवर उद्याच्या मोर्चा च्या पार्श्वभूमीवर आंबा बागायतदार शेतकरी शिष्टमंडळाने पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ नेते आंबा बागातदार एम. के. गावडे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व अन्य आंबा बागायतदार उपस्थित होते.


