कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधून भंगसाळ नदीपर्यंत जाणाऱ्या ओहोळा मधील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर..

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधून भंगसाळ नदीपर्यंत जाणाऱ्या ओहोळा मधील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर आले असून हे काम नाम फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले.

कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधून भंगसाळ नदीपर्यंत ओहोळ जातो गेले अनेक वर्ष हा ओहोळ मातीने तसेच गाळणे भरला गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होत आहे. यामधील गाळ काढणे गरजेचे होते यासाठी स्थानिक नगरसेवक विलास कुडाळकर यांनी २०२३ मध्ये जिल्हा प्रशासनाकडे यामधील गाळ काढणे गरजेचे असल्याबाबत पत्र दिले होते. गाळ काढण्याची परवानगी मिळाली होती. मात्र त्यावेळी कोसळलेल्या पावसामुळे गाळ काढण्याचे काम होऊ शकले नाही. दरम्यान २०२४ मध्ये पुन्हा एकदा नगरसेवक विलास कुडाळकर यांनी गाळ काढण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला. या पत्राच्या अनुषंगाने तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हा प्रशासनाने कारवाई सुरू केली जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली तसेच गाळ काढण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले.

 

पालकमंत्री नितेश राणे यांनी पहिल्या टप्प्यात दिली मंजुरी

नदी, ओहोळ मधील गाळ ही मोठी समस्या असल्याचे निदर्शनास आल्यावर त्या संदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी बैठक आयोजित केली आणि या बैठकीमध्ये तात्काळ गाळ काढणे कुठे गरजेचे आहे त्याची माहिती घेतली त्यामध्ये कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील गाळ काढणे पहिल्या टप्प्यात घेण्यासंदर्भात निर्देश दिले आणि १ फेब्रुवारीपासून ही मोहीम सुरू करण्यासंदर्भात आदेश केले.

 

आमदार निलेश राणे यांच्याकडे करण्यात आला पाठपुरावा

या गाळा संदर्भात नगरसेवक विलास कुडाळकर यांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यांनी या कामाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर गाळ कसा काढला जाईल या संदर्भात प्रशासनाची बोलणी केली. दरम्यान गाळ काढण्याचे काम नाम फाउंडेशनला दिल्यानंतर या कामाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून गाळ काढण्यासाठी नाम फाउंडेशनने सुरुवात केली. आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काढलेला गाळ शेतकऱ्यांना घेऊन जाण्यासाठी कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही यासंदर्भात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी निर्देश दिले आहेत.

 

पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्यामुळे शक्य झाले गाळ काढणे

 

या संदर्भात स्थानिक नगरसेवक विलास कुडाळकर यांना विचारले असता ते म्हणाले की, गेले अनेक वर्ष हा प्रश्न भेडसावत आहे. मात्र खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागला. यामध्ये अनेक अडचणी आल्या पण त्या मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने साथ दिली. नाम फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे ते काम केले. हे काम केल्यामुळे पूर्णपणे परिस्थिती आटोक्यात येईल असे नाही पण पुराची जी तीव्रता आहे. ती कमी होणार आहे. कारण ओहोळ ८ ते १० फूट खोल करण्यात आला आहे सध्या या ओहोळामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. पूरस्थिती थोडीफार आटोक्यात येणे गरजेचे होते आणि गाळ काढल्यामुळे ते शक्य होणार आहे असे त्यांनी सांगितले.